Sunday, February 19, 2012

महाशिवरात्रीच्या आठवणी

जय भोलेनाथ!
आज महाशिवरात्र.. शंकर म्हणजे हिंदूंचे आराध्य दैवत. पोस्ट लिहितोय, म्हणजे आम्ही शंकराचे म्हणावे तेवढे मोठे भक्त नाहीत. कारण फक्त एवढंच की, महाशिवरात्रीच्या आमच्या काही आठवणी आहेत, त्या दर वर्षी ताज्या होतात.

२००९ साली महाशिवरात्र २३ फेब्रुवारी रोजी आली होती. वार होता सोमवार. अर्थातच आधीचा दिवस २२ फेब्रुवारी म्हणजे रविवार असणार! आणि हा दिवस म्हणजे आमच्या बाजीरावांचा वाढदिवस. आता बाजीराव म्हणल्यावर त्यांना वाढदिवस कसा एडवेंचरस करावा वाटला. शनिवारच्या जागण्यामुळे सगळे उशिरा उठले. माझा पुरंदर गडावर जायचा प्लान होता, आणि मी रूटपण विचारून घेतलेला होता. सगळ्यांचा होकार आला, आणि पुरंदर फायनल झालं.

रूमवर बारीक सोडून सगळेजन होते. बारक्याची कुठली तरी परीक्षा होती. मी त्याला आणायला गेलो. आम्ही रूमवर येई पर्यंत १ वाजला होता. मग बारक्याच नटून झालं. गाडीला किक मारे पर्यंत १:३० झाले. एन.एच. ४ वर गाड्या लागल्या, आणि विखुरल्या. एक गाडी ८० च्या स्पीड ने (माझी), दुसरी ७० (ओम्या), तिसरी ५०-६० (बगळ्या) आणि चौथी ४० (डक्क्या आणि अवधूत). 

एन.एच ४ आणि आमची साथ संपली ते कापूरहोळपाशी. तिथून मग नारायणपूर आणि मग पुरंदरचे घाट. जाताना ओम्याच्या गाडीने चेन कवर इजेक्ट करून टाकल. ते जोडून घ्याव लागल. अरे हो, बगळ्याने नवीन आयपॉड घेतला होता. पूर्ण रस्त्याने तो गाणे ऐकत गाडी चालवत होता.

आता गडापर्यंत जायला मस्त रोड झालाय. त्यावेळी सगळं खडकाळ होत. पायथ्याला गेल्यावर विचार विनिमय झाला, आणि आम्ही गाड्या वर पर्यंत न्यायच्या ठरवल्या. नेहमी प्रमाणे सिक्वेन्स ठरलेला होता. मी, ओम्या, बगळ्या आणि डक्क्या. ओम्या च्या मागे ओंक्या होत, आणि पल्सरवर अति प्रेम. ओम्या गाडी देत नाही असं लक्षात आल्यावर ओम्याच डोक खायला चालू केल. अबे, प्रसाद्या कडे बघ बे.. कसं चालवायले.. पडल.
शेवटी, ओम्याने मला थांबवून ओंक्याला गाडी द्यायला सांगितलं. ओंक्याने तिथेही पराक्रम करूनच दाखवला होता. गाडी दगडात फसली म्हणून गनीमत, नाही तर ओंक्या आणि गाडी दोघेही खाली!

कसा बसा गड आला. तिथून पुढे पायी जायचं होत.
अवधुत्याच फोटो सेशन चालू झालं. प्रसाद, असा फोटो काढ, आता असा. मग तसा..
निख्याच्या नकला चालू होत्या. बघ, प्रसाद्या असा चालते, अवधुत्या असा हात करते, ओम्या असं हासते.
आत्याच्या धावण्ड्याच्या गोष्टी चालू झाल्या.
बगळ्या एक तर गाणे ऐकू लागल नाही तर आयआयआय करून हसू लागल.
माझ आणि निख्याच एकच काम. आयआयआयआय करून ओरडायच.

काही वेळाने बगळ्याला एवढा राग आला, कि कोणी जरी ओरडलं तरी निख्यालाच मारतो म्हणू लागलं.
गड फिरून झाला, आणि परतीच्या वाटेला लागलो. आता सगळे थकलेले होते, गाड्या संथ गतीने चालल्या होत्या. तेवढ्यात एक गाडी ओवरटेक करत गेली. जाताना आय आय आय आय करत कोणी हसत गेलं, आम्हाला ओळखायला एक सेकंद सुद्धा लागला नाही, कि हे बगळा आहे. ओरडून त्याला सांगत होतो, अबे स्पीड कमी कर, पुढे दगडी पूल आहे. कानात आयपॉड चे बुच असल्याने बगळ्या थांबला नाही, आणि खडखडत धडपडत कसा बस पूल पार केला. आम्ही सुटकेचा श्वास सोडला, कारण आम्हाला हाडं वेचाव लागले असते त्याचे.

त्या नंतरचा शिवसुंदर धाब्यावरचा थरार!
तर अशी आमची महाशिवरात्र. बाजीरावची एडवेंचर, बगळ्याच्या किंकाळ्या, अवधुत्याच्या फोटो पोजेस, आणि निख्याचे चाळे. म्हणून कधीही महाशिवरात्र आली, की आमच्या ह्या आठवणी ताज्या होणारच!

(आज भरपूर काम आहे, म्हणून पोस्ट खूपच आटोपती घेतलीये. नाहीतर सांगण्यासारख खूप काही आहे)

-पी.के.

No comments: